Friday, January 3, 2020

एक घास चिऊ चा ....

लग्नाला एक वर्ष होऊन गेलेलं.  दोघांना चाहूल लागली छोट्या नवीन पाहूण्याची. दोघांत आता तिसरं कोणीतरी येणार होतं. दोघाचाही आनंद गगनात मावेना. तिच्या कोड-कोतुकाचे दिवस चालू होते.

ती दोघे घरापासून दूर राहत असल्यामुळे तिची काळजी घेणारं 'तो' सोडला तर जवळचं असं कोणी नव्हतं. नातेवाईक दूर. सांगणार कोणाला? स्वतःचे डोहाळे स्वत:लाच पूर्ण करावे लागत होने. कधीतरी तिच्या ताईचा फोन यायचा . "का गं? काय खाऊ वाटतंय? तिखट की गोड?" ती लाजून म्हणायची " काय सांगू ताई.. झणझणीत खायची इच्छा होतेय गं. "बयो.. लक्ष्मी येतेय वाटतं तुझ्या घरी.. " फिरकी घ्यायला ताई कमी नव्हती.

दिवस जात होते. सगळ्यात जास्त तिला डोहाळे लागले ते आईच्या हातच्या वरण-भाताचे. वडिलांच्या काळजीमुळं आईला कुठे जाता येत नव्हतं. तिला बोलवावे तरी कसं. सांगू तरी कसं. उगीच तिला एवढे पण आपण लेकीसाठी  करू नाही शकलो त्याची रुखरुख लागायची.

तश्यातच दिवाळीचा सण आला. दोघांनाही वाटलं, बरेच दिवस झाले होते गावी जाऊन. परत लवकर जाता पण येणार नव्हतं. तीही खूष होती. आई-वडीलांना तब्बल चार महिन्यांनंतर ती भेटणार होती. पण तरी तिला त्याच अप्रूप नव्हतं. ती खूष होती कारण आपल्या पिल्लाचं मागणं पूर्ण करायची अनायसे एक संधी चालत आलेली म्हणून.

रस्ते खराब. तिचा नवरा तसा कडकच. त्याला काही बोलायला ती बिचकायची. आईला बोलवावे तर भला मोठा गोतावळा तिच्या मागं. आनंदावर विरजण पडावं तसेच काहीतरी झाले. दिवाळीला तिला माहेरी काही जाता आले नाही.

प्रवासामुळे , दगदगीमुळे आणि नोकरीवरचा ताण. ती गावावरून आली तशी आजारी पडली. खोकला-पडसं काही केल्या जाता जाईना. त्यातच एक दिवस तिनं खूप काम केलं. जड सामान उचलायचं नाही हे तिच्या लक्ष्यातच नाही आलं. एक-दोन दिवस उलटून गेल्यावर तिच्या पोटात दुखायला लागलं. एक-दोन दिवस तिनं दूर्लक्ष केलं. नवऱ्यालाही तिनं सांगितलं. त्याला तरी काय कळणार. एक-दोन दिवस वाट बघू एवढेच तो बोलला.

डॅाक्टरांनी पाहिल्यावरच कामाच्या ताण खूप पडलाय, आरामाची गरज आहे सांगितले. आराम करेल ती कसली. परिणाम व्हायचा तोच झाला. दुसऱ्यांच्या काळजी करण्याच्या स्वभावामुळे, आराम करायचं सोडून धावपळ करण्यामुळे तीला bleeding चालू झालं.हॉस्पीटल मध्ये अॅडमिट करावं लागलं. डॉक्टर बोलले गर्भपाताची शक्यता आहे. ५०-५०% chances आहेत. तरी आपण प्रयत्न करु. दोघांच्याही पायाखालची जमीनच सरकली. एवढे दिवस एक स्वप्न उराशी बाळगून होती ती दोघं. दोघांनी एकमेकांना धीर दिला. दोघांना एकमेकांना शिवाय होतंच कोण?

त्यानं दोघांच्याही घरच्यांना बोलावून घेतलं. आधाराची गरज तिच्याएवढीच त्यालाही होती. तो धीर देत तिला बोलला.. "बाळाच काही नाही .तु वाचली पाहिजे." पहिल्यांदा तिला जाणवलं त्याच्यातल्या हारलेला माणूस.

दुसया दिवशी तिची आई आली. कधीही साधी सलाईन सुद्धा
न लावलेल्या मुलीला, ICU मध्ये अश्या अवस्थेत बघून ती घाबरली. पण त्यावेळी लेकीपेक्षा जावयाला धीर देणं गरजेचं होतं. धीर द्यायला लेकीला तशीही शुदध होतीच कुठे? तिला शुध्द आल्यावर आईनं विचारलं, "काय आणू खायला? तुला आवडतो तसा उपमा आणू?". "आई, जमलं तर वरण-भात आणशील?"

 दुसया दिवशी तिच्या सलाईन नी भरलेला हात पाहून आई तिला घास भरवणारच तेवढ्यात ती आईला म्हणाली "हयांना आत पाठवते का ग? " नवरा आत आल्यावर ती त्याला विनंती करून बोलली. "मला हा 'वरण-भात' खाऊ घाला, Please. मला तुमच्या हातूनच खायचं आहे". तो आश्चर्याने तिच्याकडे बघत होता. आई असताता मला का बोलावलं हिनं? 'तुम्हीच खाऊ घाला, Pleare". ती परत एकदा त्याला बोलली. त्यानं पहिला घास भरवल्यानंतर तिच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहायला लागले.

तो तिला धीर देत होता. " होईल गं सगळं ठीक". ती हारली होती. पण समाधानी झाली होती. शेवटाला का होईना तिच्या पिल्लाचे डोहाळे, त्याचं मागणे तिनं पूर्ण केलं होतं. त्याच्या वडिलांच्या हातून भरवलेला तो वरण-भाताचा घास आज तिला सगळ्या सुखांसमोर अनमोल वाटत होता. बाळ वाचेल की नाही तिला माहित नव्हतं. पण त्याची ईच्छा पूर्ण केल्याचं समाधान मात्र तिच्या चेहर्यावर होतं.

                                                    

Popular posts from this author