Monday, October 7, 2019

भेटली तु पुन्हा

    Mumbai was always a 'city of fear' for me. इथली धावपळ, गर्दी, घाम, अक्षरश: नको वाटायचं. कुठली अवदसा मला आठवली म्हणून मी पुणे सोडून मी इथे आले वाटायचं. २०१५ मध्ये मुंबई सोडताना 'पीछा सुटला बुवा आपला' म्हणून खूप खूष झाले होते. पण नशीबाने परत इथंच आणले.
   कॅपजेमिनी माझ्यासाठी कधीच टर्निंग पॉइंट नव्हता आणि आणि होणारही नव्हता. तरीही मी अनिच्छेने का होईना कॅपजेमिनी जॉईन केली. आयुष्यातलं एक छोटं कोडं सुटायचं बाकी होतं. ते सुटेपर्यंत मुंबई सोडू शकत नव्हते. रडतखडत मुंबईत दिवस काढणे चालू झाले. पण यावेळी अनुभवलेली मुंबई मागच्या वेळेपेक्षा खूपच निराळी होती. इथं दोनच ऋतु होते पण तरीही कमतरता वाटत नव्हती. त्या धावपळीत पुढे जाण्याची जिद्द होती. गर्दीत आपुलकी लपलेली दिसली. अन् कष्ट होते म्हणून घाम होता. कदाचित मुंबई कडे पाहण्याचा माझाच दृष्टीकोन बदलला होता.
  तसेच काहीतरी होत मुंबई च्या वाऱ्यामध्ये.. मुंबई लोकल च्या खिडकी किंवा दरवाजा मधून येणारा थंड वारा.. बऱ्याच गोष्टींची आठवण देणारा.. कॉलेज चा तो पहिला अल्लड दिवस.. जॉब च्या पहिल्या वहिल्या दिवशीच जबाबदारी ची जाणीव करून देणारा.  तिला भेटायला जाताना ची हुरहूर अनुभवणारा.. आणि तिला भेटुन आल्यावर परतीच्या वाटेवरचा विरहाचा सोबती. उशीर झाला आणि आपलं बाळ कदाचित झोपल म्हणुन बाळाला मिठी नाही मारता येणार म्हणून वडिलांना अपराधीपणाची जाणीव करून देणारा.. तो एकच.. पण प्रत्येकाशी बांधीलकी मात्र वेगवेगळी ..
   पूर्वी पुण्याला जायचा एकही चान्स न सोडणारी मी ह्यावेळी पुण्याला जायचं 'उद्यावर' ढकलत होते. तो उद्या वर्षभरात कधी आलाच नाही. उलट मीच मैत्रिणीला 'तुच ये ना ग मुंबईत' म्हणून बजावत राहिले. आणि पुणे हळूहळू मागे सुटत गेलं... 
   मुंबई सोडायची वेळ जवळ आली आहे हे जाणवल्यावर आज डोळ्यात टचकन पाणी आलं. मुंबईने मलाही तिच्या साच्यात कधीच उतरवले होते.. मग जाणवलं की मुंबई माझी नाही तर मीच मुंबईची झालीये..


7 comments:

Popular posts from this author